देशातील सर्व निर्भीड व प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ पत्रकार आणि साहित्यिकांना मानाचा सलाम...
(लोकशाहीचा आधारस्तंभ व लोकशाही टिकवून ठेवणारे खरे योद्धे )
देशहितासाठी झटणाऱ्या, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या, सरकारच्या चुकीच्या कार्यप्रणालीवर निर्भीडपणे जाब विचारणाऱ्या स्वाभिमानी लेखणीला आणि प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ पत्रकारितेला संपवण्याचे, तिची गळचेपी करून लोकशाहीच्या नावाखाली अदृश्य अशी भयानक हुकूमशाही सुरू ठेवण्याचे षडयंत्र सुरू झालेले आहे. जे कधीच सर्वसाधारण सामान्य जनतेला न्याय, हक्क व चांगली जीवनशैली प्रदान करू शकत नाही.
भ्रष्ट व्यवस्थेला खतपाणी घालण्यासाठी पूरक खत म्हणून लाचार, विकल्या गेलेल्या लेखण्यांचा सुळसुळाट या सरकारच्या काळात विपुल प्रमाणात झालेला आहे. अशा पैशाने विकल्या गेलेल्या लोकांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्याऐवजी राज्यकर्त्यांचे अधिकृत चापलूस बनून राहणे योग्य ठरेल.
कारण पत्रकारिता हे फक्त पैसे कमावण्याचे साधन नसून तो एक क्रांतीचा आवाज आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याचा, दबल्या-पिचलेल्या गरीब जनतेच्या हक्कांचा एल्गार आहे, देशाची अखंडता, सार्वभौमत्व टिकवून जनतेच्या प्रत्येक पैशाचे नियोजन सरकारमधील जनतेचे सेवक असलेले राजकारणी आणि अधिकारी नीट प्रामाणिकपणे करत आहेत का यावर बारीक लक्ष ठेवून ते चुकत असतील तर त्यांना जाब विचारून जनतेला त्याबद्दल जागृत करून देशहित जपणारे एक जबाबदारीचे पद आहे.
आणि हे सर्व ज्या जनतेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्या जनतेने नेत्यांची, राजकारण्यांची भक्ती करणे सोडून खऱ्या पत्रकारितेला बळ व खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. तरच जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटेल व चापलूसी करणाऱ्या बनावट स्वार्थी पत्रकार व साहित्यिकांना जरब बसेल आणि सत्यपरिस्थिती जनतेसमोर येईल.
अन्यथा स्वातंत्र्य मिळूनही स्वतःच्या देशातील माणसांच्या हातातच देशाचा कारभार व स्वतःचा कष्टाचा पैसा सोपवून अदृश्य पारतंत्र्यात जीवन जगण्यात धन्यता मानणारी जमात म्हणून आपली ख्याती चिरकाल पृथ्वीतलावर टिकून राहील.
" एकजुटीची ताकद आता
दाखवण्याची गरज भासते,
षंढासारखे जीवन जगणे
हे तर मरण्यासमान असते..."
के. सतीश
✒️K. Satish









%20Thoughtswing.com%20title%20images_085.jpg)
%20Thoughtswing.com_132.jpg)